मुलांचे लाड कितपत करावे?

pampering kids

“माझ्या बाळाला काहीतरी सांगा हो. रोज नवंच काहीतरी हवं असतं. नाही मिळालं कि त्याचा मूड जातो. तो जेवत नाही. बोलत नाही. आम्हाला फार काळजी वाटते त्याची.” आई तिच्या बाळाबद्दल डोळ्यात पाणी आणून सांगत होती. बाळाचं वय १४ वर्षं.

बोलता बोलता कळलं कि, बाळ सगळ्यांचा अत्यंत लाडका होता. हुशार होता. पण एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असायची. लहानपणी तो रडायचा. श्वास रोखून धरायचा. मग पळापळ व्हायची. बाळाला जे हवं ते मिळायचं. मोठा झाला तसं रडणं कमी झालं. मागण्या मात्र वाढतंच गेल्या. आधी खेळणी, व्हिडीओ गेम्स, मोबाईल आणि बरंच काही. मिळालं नाही कि अन्नसत्याग्रह, चिडचिड सुरू. आई अगदी रडकुंडीला आली होती. आता त्याने लेटेस्ट मोबाईल मागितला होता देणं आवाक्याबाहेरचं होतं. नकार देता येत नव्हता कारण बाळाने घर सोडून जाण्याची धमकी दिली होती.

प्रेमाच्या नावाखाली बरेचदा असे लाड होतात. मुलांना नाही म्हणणं आई-वडिलांच्या जिवावर येतं. ‘त्याच्या साठीच करतो ना आपण सगळं? मग त्याची इच्छा पूर्ण करायलाच हवी,’ असा विचार असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी मेहनत करायला हवी हे त्या पाल्याच्या गावीही नसतं. त्यातून इतरांना होणारा त्रास, ओढाताण त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण आपणच ती पोहोचवत नाही. ‘मला काय हवंय’, एवढाच विचार डोक्यात असतो. ‘मला जे हवंय ते मिळायलाच हवं’, असा दृष्टीकोण. ह्या दृष्टिकोनाच्या बरोबरीने एक आयदीपणा अंगात शिरलेला असतो. जो आई-वडिलांना ब्लॅकमेल करण्याचं काम उत्तमरीतीने पार पाडतो.

आई-वडिलांना वाटत असतं, ‘आपण सगळं दिलंय, त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न केलेत. प्रसंगी उपाशी राहून त्याची हौस भागवलीये. तोही असंच वागेल.’ पण होतं भलतंच. जेव्हा देणं थांबतं तेव्हा आई-वडिलांची किंमत कमी होऊ लागते. राग वाढत जातो. ‘त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाही,’ हा विचार तुम्हीच तर त्याच्या मनात पक्का बसवलेला असतो. तोही मग फक्त स्वतःलाच महत्त्व देतो. अहंकारी होत जातो. चूक फक्त त्याचीच असते का?

हे लाडावणं फक्त वस्तूंच्या बाबतीत नसतं. बरेचदा, कामाच्या बाबतीतही असंच होतं. मुलांना त्रास नको, म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वत:च पुढे होऊन कामं केली जातात. पाण्याचा ग्लास हातात देण्यापासून पाय चेपण्यापर्यंत मुलांची कामं करणाऱ्या, अगदी मुलाच्या मुलालाही स्वतः ची जबाबदारी समजून सांभाळणाऱ्या अनेक आई पाहिल्यायत. मुलं तुम्हाला गृहीत धरू लागतात. तुम्ही नकार दिलात कि तुम्हाला ऐकवू लागतात. कामं करून करून तुम्ही थकता तेंव्हा तो थकवा कुणी पाहतच नाही. कारण तो येतो, हेच तुम्ही त्यांना कळू देत नाही. त्याची काही कर्तव्य आहेत हे त्याला जाणवलंच नाही तर तो पार पाडणार तरी कशी?

अशी मुलं वरकरणी कितीही स्ट्रॉंग वाटली तरी मनातून दुबळी असतात. परिस्थिती हाताळण्याचा त्यांचा मार्ग त्यांना स्वतःला किंवा दुसऱ्यांनाही धोकादायक ठरू शकतो. मुलं इतरांचा विचार करूच शकत नाहीत. जेव्हा अपयशी ठरतात तेव्हा त्याची कारणं इतरांमध्ये शोधू लागतात. एक दृष्टिकोन तयार होतो, ‘I am okay, you are not okay.’ इतर लोक कसे चुकीचे आणि मीच कसा बरोबर हा विचार त्यांना इतरांपासून तोडू लागतो. अयशस्वी नातं, बेजबाबदार वागणं, आणि दुराभिमान असं काहीसं कॉम्बिनेशन तयार होतं.

फाजील लाड आणि प्रेम ह्यांत एक रेषा आहे. बरेचदा ती दिसतंच नाही. काही वेळेस दिसत असूनही आपण पाहत नाही. मुलांना उभं करायचं असेल, स्वतंत्र करायचं असेल तर हि रेषा पाहायलाच हवी.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 Responses

  1. Sukhada Kulkarni says:

    Khup chan vasudha.tuze likhan khup chan aste.Hyasobatach tu ase kahi upay suchavles,tar amcha sarakhya parents na khup fayada hoil.Jasa ki mazi mulgi 4.8 yrs chi ahe,tila atapasun swatahchi kame Kashi karavit he kasa shikavta yeil? Asa kahisa.

  2. Pandurang abhang bhure says:

    Khup Chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!