मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात

पंकज भय्या,

मी तेवीस वर्षाचा एक युवक आहे. काही वर्षांपुर्वी माझा अपघात झाला आणि माझ्या डोळ्यांची सर्जरी झाली. त्यात माझा एक डोळा कायमचा निकामी झाला. मला झालेल्या डोळ्याच्या ह्या दुखापतीमुळे माझा आत्मविश्वास कमालीचा ढासळला आहे.

मला लोकांमध्ये मिसळायची, त्यांच्याशी बोलायची खुप इच्छा असते पण मला ते अजिबात जमत नाही, ते मला नाकारतील, माझ्याकडे दुर्लक्ष करतील, अशी मला मनातल्या मनात भीती वाटते.

अशातच मला निराशेने घेरले आहे, डॉक्टर म्हणतात, हा एक प्रकारचा स्क्रिझोफेनिया आहे, हॅलोसिनेशनचा एक प्रकार आहे. यामध्ये दृष्टीभ्रम होतात, ट्रीटमेंट, औषधौपचार चालु आहेत, ह्या असल्या विचित्र प्रकाराने मी घाबरुन गेलो आहे, सर!

मला पुस्तके वाचण्याची खुप आवड आहे, शारिरीक मर्यादांवर मात करुन, मला ह्या जगामध्ये माझी ओळख जबरदस्त ओळख निर्माण करायची आहे,

माझ्या स्वतःबद्द्लच्या अपेक्षा, माझी स्वप्ने, खुप खुप मोठी, भव्य दिव्य आणि उत्तुंग आहेत, पंकज भय्या!

मला माझ्या निराशेला पळवुन लावायचे आहे, आणि खुप आनंदी जीवन जगायचे आहे.

ह्या आजाराला सामोरे जाण्याचे मला मार्ग सुचवा, प्लिज!

XXX,

मी तुला जवळपास मागच्या तीन वर्षांपासुन ओळखतो. तुझ्या आयूष्यातील समस्या मांडण्यासाठी तु मला निवडलेस, याबद्द्ल मी तुझा विशेष आभारी आहे.

खरं सांगु, तुझा प्रश्न वाचला आणि माझ्यासमोर माझाच भुतकाळ उभा राहीला.

सात आठ वर्षांखाली मलाही तीव्र नैराश्याने ग्रासले होते. जगात कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही, सगळे जण मला टाळतात, माझी मस्करी करतात, अशी माझी धारणा झाली होती.

माझं बोलणं, माझं दिसणं, लोकांना आवडत नाही, असा माझा भ्रम झाला होता. ना मला कोणी जवळचे बेस्ट फ्रेंड म्हणावेत असे मित्र होते, ना नवे मित्र बनवण्यासाठी मी पुढाकार घ्यायचो.

त्या काळात मला प्रचंड निराशेने ग्रासले होते.

रोज तयार होवुन मी ऑफीसला येऊन बसायचो, आणि दिवसभर फेसबुक, यु ट्युब आणि टी. व्ही. बघुन टाईमपास करायचो. जेवणे आणि झोपणे हाच दिवसभराचा कार्यक्रम असायचा.

जीवनात कसलंही ध्येय नव्हतं!

आयुष्य संपुर्णपणे भरकटलेलं होतं, मी कधी काही एचिव्ह करु शकेन का? अशी मला स्वतःलाच शंका यायची.

एकटाच शुन्यामध्ये नजर लावुन तासनतास बसुन रहायचो.

आई, वडील, भाऊ, बहीण सगळ्यांपासुन लांब लांब पळायचो, आणि कोणी समजवायला आलाच तर सर्वांना उलट उत्तरं द्यायचो. जोरजोरात ओरडायचो, भांडायचो.

मी असं का वागायचो? माहित नाही.

आज इतक्या वर्षांनी आत्मपरीक्षण केल्यावर मला आता जाणवतयं, की मी ही एक प्रकारच्या मानसिक आजारपणातुनच जात होतो.

XXX, एके दिवशी तुझ्यासारखीच माझ्याही मनात आशावादाची ज्योत पेटली, आणि मला माझ्या जीवनात बदल घडवायचा आहे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.

स्क्रिझोफॅनिया, हॅलोसीनेशन, मानसिक आजार, मानसिक विकृती, डिप्रेशन ह्या असल्या मोठमोठ्या शब्दांनी, तु अजिबात घाबरु नको.

तुझ्या आतमध्ये एक प्रचंड मोठा उर्जेचा स्त्रोत आहे, एक चैतन्याचा झरा दिवसरात्र खळाळत वाहतो आहे.

त्या उर्जेच्या बळावरच मी माझ्या आयुष्यातल्या एकुण एक समस्येला दुरवर पळवुन लावलं, आणि आज मी जगातला सर्वात आनंदी प्राणी आहे, असं मानतो.

नेमकं काय केलं होतं मी?

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी पंधरा सुत्रे आज मी तुला सांगेन.

१) सतत पॉझीटीव्ह

कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

२) प्रेमात पडा

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि ,मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.

सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

३) महिन्याला दोन पुस्तके

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

४) टी. व्ही ला बायबाय

निराशा आणि मानसिक आजार यांना आमंत्रण देण्यामध्ये, टी.व्ही., सोशल मिडीया, यु ट्युब, मुव्हीज पाहणे, हे सगळे कारणीभुत ठरतात, यांच्यापासुन स्वतःला दुर ठेवा.

आज मी दिवसातला फक्त एक तास, किंवा तासातले फक्त दहा मिनीटंच ह्या सगळ्यांना देईन, असं दिवसाच्या सुरुवातीलाच स्वतःला सुचना द्यायची, आणि हळुहळु आपला त्यातला इंट्रेस्टच कमी होत जातो.

५) डायरी लिहा

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

६) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे,

आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

७) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा

तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

मी असा वेडेपणा खुपदा केलाय, मला पेंटींग येत नसताना मी माझ्या ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला.

मागच्या वर्षी, माझी खरी ओळख लपवुन मी गावाबाहेरच्या एका सुताराच्या हाताखाली मी एक आठवडा रोज चार तास हेल्पर म्हणुन काम केलं.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो. अनेक थरारक अनुभव घेतले, स्वतःसोबत घालवलेले ते पाच दिवस मी कधीही विसरणार नाही.

नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत गेलो, तो ही एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता.

८) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

९) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

१०) महिन्याला एक वाईट सवय सोडा

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो.

महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

११) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

१२) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

१३) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

१४) सुरक्षित अंतर ठेवा

जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे.

निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

१५) तीस दिवसांचा प्लान

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं!…

ह्या पंधरा सुत्रांनी मला एक नवा जन्म दिला.

तुलाही त्यांची निश्चित मदत होईल.

मला तुझ्या क्षमतांवर पुर्ण खात्री आहे, तुझ्या डोळ्यातली स्वप्ने पुर्ण करण्यापासुन तुला कोणीही रोखु शकणार नाही.

एके दिवशी हे जग तुला सॅल्युट करेल, अशी गरुड भरारी तु घेशील, ह्या ठाम विश्वासासह.

धन्यवाद आणि मनःपुर्वक शुभेच्छा!!!…

अमेझॉनवर उपलब्ध असलेली मानसशास्त्राची पुस्तके

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

9 thoughts on “मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात”

Leave a Comment