१६ डिसेंबर १९७१ हा दिवस भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली साक्षीदार आहे. ह्याच दिवशी जवळपास १ लाखाच्या आसपास (९३,००० हजार) पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सैन्यापुढे शरणागती पत्कारली. ह्या विजयासोबत एका नवीन राष्ट्राचा उदय जागतिक नकाशावर झाला. त्या दिवसापासून भारत आणि नवीन तयार झालेला बांगलादेश हा दिवस विजय दिवस म्हणून त्या सोनेरी क्षणांची साक्ष म्हणून साजरा करत आहे. ह्या युद्धात भारताने पूर्वेकडे बांगलादेश च निर्माण केल तर पश्चिम बाजूला पाकिस्तान चा ५७९५ स्केवर माईल्स (१५,०१० स्केवर किलोमीटर) चा प्रदेश हि आपल्या ताब्यात घेतला (सिमला करारा प्रमाणे भारताने गुड विल म्हणून हा प्रदेश पाकिस्तान ला नंतर परत केला होता). पाकिस्तान ला चारी मुंड्या चीत करणारा हा विजय इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला गेला आहे.
३ डिसेंबर १९७१ ला संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी पाकिस्तान ने भारताच्या ११ हवाई तळांवर ज्यात श्रीनगर, जोधपुर, अंबाला, आग्रा, अवंतीपूर, पठाणकोट हे हवाई तळ होते त्यावर अकस्मात हवाई हल्ला केला. हल्ला करून पण पाकिस्तान भारताच्या विमानांना किंवा हवाई तळांना जास्त नुकसान पोचवू शकला नाही. ह्या हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने अगदी कमी वेळात पाकिस्तान च्या दोन्ही कमांड पश्चिम आणि पूर्व अश्या दोन्ही ठिकाणी आपले हल्ले सुरु केले. भारतीय हवाई हल्याने पाकिस्तान चे कंबरडे मोडायला जास्त वेळ लागला नाही. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील हंटर, एस. यु. ७ , मिग २१ ह्यांनी काही क्षणात हवेतच पाकिस्तान चे बारा वाजवले. पश्चिम तळावर भारतीय वायू दल एका दिवसात ५०० पेक्षा जास्त उड्डाण भरत होती जी कि दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्ती होती. इतक्या प्रचंड माऱ्यापुढे पाकिस्तान निष्प्रभ झाला होता. पूर्व तळावर त्याच वेळी भारतीय वायू दलाने तब्बल ४००० पेक्षा जास्त उड्डाण भरून पाकिस्तान च्या नौदलाला आणि सैन्याच्या नाकीनऊ आणले.
भारतीय विमानांनी पाकिस्तान च्या पूर्व तळावर हल्ले चढवत पाकिस्तान चे २ हवाईतळ आणि तेथील लढाऊ विमाने पूर्णपणे नष्ट केल. हवेत वर्चस्व गाजवताना भारताच्या सैन्यांनी जमिनीवरून चौफेर हल्ला पाकिस्तान च्या पूर्व कमांड वर चढवला. भारताच्या जाबांज सैनिकांपुढे पाकिस्तानी सेना मागे मागे रेटत गेली. पूर्व कमांड वर होणारी पिछेहाट पाकिस्तान च्या जिव्हारी लागत होती. भारताच लक्ष तिकडून वळवण्यासाठी पाकिस्तान ने मग पश्चिम भागाकडून जोरदार हल्ला करायला सुरवात केली. भारताच्या पुंछ, छांब सारख्या भागात लढाई सुरु झाली. पण भारतीय सैन्याच्या जिगरबाज सैनिकांपुढे त्यांचे सगळे पर्याय कमी पडले. तिकडे हि आपली डाळ शिजत नाही बघून मग पाकिस्तान ने वाळवंटात आपला मोर्चा उघडला. तह झाला तर ह्या वाळवंटाच्या जागेच्या रूपाने आपल्याला टेबलावर काही गोष्टी मांडता येतील असा पाकिस्तान चा डाव होता. पण त्यांची गाठ भारतीय सैनिकांशी होती. बॅटल ऑफ लोंगेवाला कोण विसरू शकेल. (बॉर्डर चित्रपटाची कथा ह्याच धुमश्चक्री वर आधारित आहे) मेजर ( नंतर ब्रिगेडीअर ) के.एस. चंदपुरी च्या २३ पंजाब इंफ्रानटरी च्या टीम ने शंभर पेक्षा जास्त रणगाड्यांना रात्रभर थोपवून धरल. सकाळ होताच भारताच्या वायुदलाने पाकिस्तान च्या रणगाड्यांना यमसदनास तिथल्या तिथे पाठवलं.
![Battel-of-longewal](https://manachetalks.com/wp-content/uploads/2017/12/Battel-of-longewal-300x206.png)
भारताच्या जिगरबाज सैनिकांपुढे पाकिस्तान ने सपशेल शरणागती पत्कारली. आपल्या ९३,००० हून अधिक सैन्यासह पाकिस्तान जनरल ए.ए.खान नियाजी ह्यांनी जनरल जगजितसिंह अरोरा ह्यांच्या पुढे सुहारवर्दी उद्यान ढाका इकडे १६ डिसेंबर १९७१ ला शरणागती पत्कारली. हाच दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या अतुल्य शौर्याने, पराक्रमाने आपल्या शत्रूला चारी मुंड्या चीत करणाऱ्या सर्वच सैनिकांना माझा कडक स्याल्युट. आपल्यासाठी महत्वाचे असणारे दिवस आपण अगदी लक्षात ठेवतो. फ्रेन्डशिप डे, व्ह्यालेनटाईन डे, चॉकलेट डे आणि लिस्ट गोज ऑन. पण ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले. आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताचा तिरंगा अभिमानाने डौलत ठेवला. आपल्या प्राणाची पर्वा न करता एका नवीन देशाची निर्मिती केली अश्या जिगरबाज, पराक्रमी सैनिकांचा पराक्रम आपल्या ध्यानी मनी नाही हीच ह्या देशाची खंत आहे. आजच्या दिवशी त्या दिवसाची आठवण करून त्या सैनिकांना आपण जर त्यांना मानवंदना दिली तर आपण खऱ्या अर्थाने विजय दिवस साजरा केला अस मी म्हणेन.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Jai Hind.. nice info Vinitji.