आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केल्याने काय फायदे होतात…

आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही!

ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की तुम्ही बाजारातून ज्या काॅर्न फ्लेक्स, ब्रेड, साॅस, ज्यूस विकत आणता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते.

तुम्ही तुमच्या घरी असलेल्या यापैकी कोणत्याही उत्पादनाच्या लेबलवर वाचून खात्री करू शकता. 

खरेतर साखर ही फक्त डायबेटीक लोकांसाठीच नव्हते तर इतरांसाठी सुद्धा धोकादायक असते.

WHO च्या म्हणण्याप्रमाणे सामान्य माणसाने दिवसाला केवळ ५० ग्राम साखर खायला पाहिजे.

या पेक्षाही कमी खाल्ली तर चांगलेच. पण प्रत्यक्षात मात्र यापेक्षा खूप जास्त प्रमाणात साखर खाल्ली जाते.

रोजच्या चहा, कॉफी, सरबत, कोल्डड्रिंक याचाच विचार केला तर ५० ग्राम पेक्षा जास्त साखर पोटात जाते.  

साखर बंद करणे तर दूरची गोष्ट पण साखरेचे प्रमाण कमी करणे हे सुद्धा बऱ्याचदा शक्य होत नाही पण साखर बंद नाहीतरी निदान कमी करण्याचे अनेक फायदे आहेत.

आज या लेखात आपण हेच फायदे बघणार आहोत. 

आहारातून साखर वर्ज केल्यावर शरीराला त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेण्याआधी आपण साखरेबद्दल असलेले काही गैरसमज थोडक्यात बघू. 

साखर खाल्ली नाही तर शक्ती कशी येणार?

मित्रांनो, साखरेची वेगवेगळी नावे असतात.

आपण जी चहात घालून खातो ती सुक्रोज असते. दुधातील साखरेला लॅक्टोज म्हणतात तर फळांमध्ये असणाऱ्या साखरेला फ्र्कटोज म्हणतात.

या ही व्यतिरिक्त साखरेची अनेक नावे असतात. जर तुम्ही एखाद्या फूड प्रोडक्टचे लेबल बघितले तर ही नावे तुम्हाला समजतील.

यापैकी लॅक्टोज व फ्र्कटोज या नैसर्गिक साखर आहेत.

आपण जेव्हा दुध पितो व फळे खातो तेव्हा त्या आपल्या पोटात जात असतात.

त्याचबरोबर फळांमधून इतरही खनिजे, व्हिटामिन, फायबर हे पोटात जाते. 

याव्यतिरिक्त आपण जी कर्बोदके खातो त्याचेही रुपांतर शरीरात जाऊन साखरेतच होत असते. यामुळे शरीराला असणारी साखरेची गरज पूर्ण होते. 

मित्रांनो, यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे साखर कमी करायला फळे खाणे बंद करायची काहीच गरज नसते कारण फ्र्कटोज हे साखरेचे नैसर्गिक रूप आहे.

पण त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काही पदार्थांच्या लेबलवर ‘फ्र्कटोज’असा साखरेचा उल्लेख असतो.

पण फळांमधून मिळणारी फ्र्कटोज आणि या फ्र्कटोज मध्ये खूप मोठा फरक असतो ही फ्र्कटोज ही नैसर्गिक नव्हे तर रीफाईन्ड फ्र्कटोज असून ती काॅर्न सिरप पासून तयार केली जाते.

यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते व त्याचा साहजिकच परिणाम वजनावर होतो. 

खरेतर साखरेमुळे शरीरात अनावश्यक असलेल्या जास्तीच्या कॅलरी जाऊन वजन वाढते हे जरी खरे असले तरी वजन कमी असणाऱ्या लोकांनी कितीही प्रमाणात साखर खाल्ली तरी चालते असे आजिबात नाही.

सर्व शरीरयष्टी व सर्व वजनांच्या लोकांसाठी साखरेचे दुष्परिणाम आहेतच तसेच साखर कमी प्रमाणात घेण्याचे किंवा पूर्णपणे बंद करण्याचे फायदे देखील आहेत. 

वजन कमी होणे या व्यक्तिरिक्त साखर आहारातून वर्ज करण्याचे फायदे 

१. जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे लक्ष विचलित होते.

एखाद्या गोष्टीत तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही.

पण जर तुम्ही गोड कमी प्रमाणात खाल्ले तर तुमचा मेंदू तल्लख होतो व कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता वाढते. 

२. जर तुमच्या आहारात गोड पदार्थ नेहमीच गोड पदार्थांचा समावेश असेल किंवा तुम्ही विकतचे फ्रुट ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी जास्त प्रमाणात घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.

डायबेटीस हा आजार लाइफस्टाइल डीसऑर्डर या गटात मोडतो.

म्हणूनच जर तुम्हाला अनुवंशिकतेमुळे किंवा अन्य काही कारणाने डायबेटीस व्हायची शक्यता असेल तर तुमच्या जीवनशैलीमुळे ती शक्यता बळावते.

म्हणजेच व्यायामाचा अभाव, जेवणात साखरेचे प्रमाण जास्त असणे अशा गोष्टींमुळे डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. 

याऊलट जर आहारात साखरेचे प्रमाण नगण्य असेल तर हा प्रश्नच येत नाही. 

३. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते.

वाढलेले वजन हे अनेक आजारांना आमंत्रण असते. वाढलेल्या वजनाशी निगडीत एक महत्वाचा आजार म्हणजे उच्च रक्तदाब.

उच्च रक्तदाबामुळे सुद्धा अनेक आजार, धोके संभवतात जसे की ह्र्दय विकाराचा झटका.

वजन आटोक्यात ठेऊन ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साखर बंद करणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. 

४. गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने दातावरील सर्वात वरचा थर, ज्याला इनामेल असे म्हणतात, तो खराब होतो.

यामुळे दातांना कीड लागण्याची शक्यता वाढते.

चहा कॉफीमध्ये जर जास्त प्रमाणात साखर घ्यायची सवय असेल तर त्यामुळे सुद्धा दात लवकर खराब होतात.

गोडाचे प्रमाण कमी केल्याने दातांचे आरोग्य सुधारते. 

५. तुम्हाला असा अनुभव नक्की आला असेल की लग्नातील जेवण केल्यावर तुम्हाला सुस्ती येते.

याला कारण असते ते लग्नातील किंवा अशा अन्य समारंभात असणारे गोड पदार्थ.

जेवणात साखर जास्त असेल तर आळशीपणा वाढतो.

म्हणूनच कामाची क्षमता वाढवण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. 

६. साखर किंवा गोड पदार्थ तुम्ही जितके खाल तितके तुम्हाला अधिकाधिक खावेसे वाटतील.

म्हणजेच गोड पदार्थ खाणे ही तुमच्या शरीराची नाही तर मनाची गरज असते.

तुम्ही जितके गोड पदार्थ खाल तितकी गोडासाठी तुमची इच्छा वाढत जाईल. यामुळे तुम्हाला दर जेवणात गोड पदार्थ हवेहवेसे वाटतील.

असे झाल्याने अति गोड खाण्याचे बऱ्याच दुष्परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल.

ती एकप्रकारची साखळी आहे. ही तोडण्यासाठी कुठूनतरी सुरुवात झाली पाहिजे.

तुम्ही गोड कमी केले तर हळूहळू गोड खायची तुमची इच्छा सुद्धा कमी होत जाईल. 

मित्रांनो, साखर बंद करणे अथवा कमी करणे हे आजिबातच सोपे नाही. आज साखर बंद करायची असे ठरवले आणि उद्यापासून तुम्हाला ते शक्य झाले असे होत नाही.

विशेष करून जर तुम्हाला गोड अतिशय आवडत असेल तर अजूनच अवघड आहे.

पण अवघड म्हणजे अशक्य नाही. तुम्ही जर मनापासून प्रयत्न केलेत तर तुम्हाला हे नक्की जमेल.

गोड/साखर बंद करण्यासाठी काही टिप्स या लेखात तुम्हाला आम्ही देणार आहोत. 

१. साखर बंद करायची ठरवल्यावर एकदम पूर्ण साखर बंद करू नये. तसे झाल्यास एखाद्या दिवशी अचानक तुम्हाला साखर घातलेले गोड पदार्थ खायची तीव्र इच्छा होऊ शकते. 

२. साखर बाद करायची ठरवल्यावर सगळ्यात आधी कोणत्याही पदार्थात किंवा पेयात वरून साखर घेणे बंद करा.

उदाहरणार्थ जर तुम्ही चहा किंवा कॉफीमध्ये साखर घेत असाल तर ती बंद करा. इतर गोड पदार्थ लगेच बंद करू नका. 

३. जर तुम्हाला चहा कॉफीमधील साखर अचानक बंद करता येत नसेल तर ती प्रथम कमी करत न्या. म्हणजे जर तुम्ही चहात एक चमचा साखर घालत असाल तर अर्धा चमचाच घाला व हळूहळू बंद करत न्या. 

४. तुम्ही हे साखरेचे प्रमाण कमी केल्यावर इतर साखर खायची तुमची इच्छा अपोआपच कमी होईल. 

५. तुम्हाला जर कोल्ड ड्रिंक्सची सवय असेल तर त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत न्या. 

६. बाहेरील पदार्थ, बेकरीचे पदार्थ बंद करा कारण त्यात साखर जास्त प्रमाणात असते. 

मित्रांनो, साखर जर तुम्ही तुमच्या आहारातून कमी केली तर त्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला दिसून येतील. तुमचे वजन कमी होईल, उत्साह वाढेल! मग मग करताय ना आजपासूनच सुरुवात? 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केल्याने काय फायदे होतात…”

Leave a Comment