स्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..!!

नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव.. देवीचा जागर करून स्त्रीरूपातील ह्या दैवताला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न असंख्य भाविक करतात..

स्त्री देवी असो किंवा मानव, तिच्याकडे असामान्य धैर्य आणि सहनशक्ती असते.. विधात्याच्या निसर्गनिर्मितीच्या कामात तिचाही वाटा असतो..

पण समाजात वावरणाऱ्या ह्या स्त्रीरुपी शक्तीला तिच्या बरोबर पुरुष नसेल, तर हाच समाज अबला समजतो.. तिच्यावर अनन्वित शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत राहतात आणि न्यायाच्या नावावर तिला पोकळ आश्वासनांशिवाय काहीही मिळत नाही..

कधी घडत असते हे..?? आणि कोणाबरोबर..??

अहो प्रत्येक स्त्री बरोबर..!!

रात्री उशिरा घरी येते, तोकडे कपडे घालते, लग्नाला उशीर झाला, लग्न झाले, लग्न नाही झाले, मूल झाले, मूल नाही झाले, नवऱ्याने सोडून दिले, घटस्फोट झाला, नवरा देवाघरी गेला अशा कोणत्याही स्थितीत असलेल्या महिलेला समाज कधीही सुखाने राहू देत नाही.. कधी वखवखलेल्या नजरा तर कधी जहरिले शब्दबाण, कधी शेलक्या शंका आणि कधी त्याहून अघोरी शारिरीक इजा..!!

स्त्रीने एकटे रहाणे हे तर जणू पाप..!! कारण काहीही असो.. जर ती एकटी राहते किंवा मुला-बाळांना घेऊन एकटी गुजराण करते म्हणजे एक तर तिला पुरुषाची गरज आहेच.. मग एक तर तो तिला जबरदस्ती मिळवून द्यायचा किंवा ती इतर पुरुषांवर नजर ठेवून आहे असाच मूर्खपणाचा ग्रह तिच्याबद्दल ठेवायचा..

समाजात राहण्यास ती कशी अपात्र आहे, ह्याची कथा रचून तिचे राहणे अशक्य करायचे.. तिचा असा मानसिक छळ करायचा, की तिने मृत्यूला कवटाळले पाहिजे..

मग अशा सिंगल मदर किंवा एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना अट्रोसिटी अंतर्गत काही सुरक्षा का मिळायला नको?

हा प्रश्नच खरंतर विचार करायला लावणारा आहे!! का करावी लागली असेल अशी मागणी, स्त्रीला शक्ती मानणाऱ्या ह्या ‘so called’ संस्कारवादी देशात..??

अशाच एका प्रकरणाबद्दल आज आपण या लेखात बोलणार आहोत

ह्या केसचे थोडेसे बॅकग्राऊंड जाणून घेऊया..

एका सकाळी कामामध्ये मग्न असलेल्या ह्या सिंगल पेरेन्ट असलेल्या ताईच्या घरावर थाप पडली..

आई कामात आहे हे पाहून, दहावीचा अभ्यास करणारे लेकरू उठले आणि दरवाजा उघडायला गेले.. जसा दरवाजा उघडला गेला तशी प्रचंड संताप घेऊन सोसायटीतली एक भडकमावशी तिच्या नवऱ्यासह घरात अक्षरशः घुसली.. दार लावले..

आणि कामात असलेल्या आपल्या ताईचा लॅपटॉप भिरकावून लावला.. शिवीगाळ करत जोरदार भांडण सुरू केले.. नक्की काय घडतंय हे लक्षात येई पर्यंत त्या ताईचा लॅपटॉप मोडला, तिला शारीरिक वेदना दिल्या गेल्या आणि एकटी पालक असल्याने तिच्या चारित्र्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत लांच्छन लावले गेले.

मनाचेTalks वर जेव्हा हा व्हिडीओ टाकला गेला होता तेव्हा कित्येक एकट्या राहणार महिलांचे आम्हाला मेसेजेस आले होते कि, त्यांच्यावर सुद्धा कधीतरी अशी वेळ येऊन गेलेली आहे. (अशा विषयी कोणाला मदत हवी असल्यास येथे सम्पर्क करू शकता. शक्य तितकी मदत केली जाईल.)

निमित्त काय होते तर सोसायटीच्या सभासद मिटिंग मध्ये सगळ्या पुरुषांमध्ये ‘ती’ मिटिंगसाठी ‘बोलावले असल्यास जाते..’ म्हणजे तिथे ती तिथल्या ‘पुरुषांना नादाला लावायला’ जात असणार असे त्या भडकमावशीचे बिनबुडाचे आरोप..

त्या मावशीने ताईच्या मुलाला जोराने ओरडून सांगितले की, “बाप नाहीये तुला पण तू तर मोठा झाला आहेस तर तुला जायला काय होते..?? आईला कशाला पाठवायचे” इतकेच नाही तर या भडकमावशीचा नवरा सोसायटीचा मेंटेनन्स जमा करतो म्हणून ताईने त्याला मेंटेनन्स पाठवून पैसे जमा केल्याचा मेसेज केला, तर त्यासाठीही ताईवर घाणेरडे आरोप केले..

विचार करा असले नीच विचार असणारी स्त्री एका अल्पवयीन, जेमतेम १६ वर्षांच्या मुलासमोर, त्याच्याच आई बद्दल अपमानास्पद आणि शेलक्या भाषेत बोलते म्हणजे तिची लायकी काय असेल..??

बरे घरात जाऊन तोडफोड करून, धमक्या देऊन ती थांबली नाही तर नवऱ्याच्या मदतीने आपल्या ताईला मारहाणही केली..

असा प्रसंग गुदरल्याने ताईने पोलिसात तक्रार केली.. एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा केली.. म्हणजे असे प्रसंग वारंवार घडायला लागले असल्याने त्या नवराबायकों विरुद्ध गुन्हा दाखल तर व्हायलाच हवा होता.. ना जाणो कधी जीवावर बेतले तर..??

तीन-तीन वेळा पोलिसात तक्रार करून कॉग्निझन्स न घेतल्याने एव्हाना ह्या भडकमावशी आणि तिच्या नवऱ्याची हिम्मत दुप्पट झाली होती..

ताईकडे न्यायालयात जाण्यावाचून आता काहीही पर्याय उरला नव्हता.. कोर्टात ती बाई आणि नवरा आणि केस न घेणारे पोलिस ह्या सगळ्यांविरुद्ध ५४ पानी केस फाईल केली गेली..

त्याच सोबत विविध पक्षांच्या ‘So called’ रणरागिणी मानल्या जाणाऱ्या बऱ्याच स्त्री राजकारण्यांकडे सुद्धा ताईने पत्र पाठवून थेट संपर्क केला नेले.. (सुप्रियाताई सुळे, चित्रताई वाघ, तत्कालीन महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या त्यातील प्रमुख)

खरंतर ही एक शोकांतिका आहे की, आपल्या राज्यातल्या-देशातल्या रणरागिनींचे रक्त सळसळते ते फक्त एखाद्या मंत्र्याला किंवा नेत्याला पायउतार करण्यासाठी!!

न्याय्य हक्क वगैरे गोष्टींशी कोणाला काहीही देणे-घेणे नसते.

बहुजन सुखाय, हिताय असल्याचा आव आणणारे हे राजकारणी अजिबात काही अंगावर घेत नव्हते. काही राजकारणी, महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव, DCP, CP, महिला आयोग, अगदी मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा… अशा काहींनी पोलिसांना कॉग्निझन्स घ्यायला सांगितले खरे पण ह्या केसचे पान काही हलेना.. आणि न्याय मिळणेही जणू दुरापास्त झाले होते..

हे अतिशय महत्त्वाचे आहे की, वरिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या आदेशाचे पालन पोलीस करता आहेत की नाही, हे बघितले गेले पाहिजे. नाहीतर ‘सदद्रक्षणाय खलनिग्रहाय’ हे फक्त भिंतीवर लिहिण्यापूरते ब्रीदवाक्य असून काय उपयोग??

ज्यातून राजकिय फायदा नाही असे कोणतेही काम करण्याची तसदी आपले राजकारणी घेत नाहीत. हा आपल्या देशाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.

नवऱ्याविना आपल्या मुलाला हिमतीने आणि एकट्याने वाढवणाऱ्या ह्या मातेला खूप मानसिक धक्के पचवावे लागत होते.. आणि भडकमावशी आणि तिचा नवरा ह्या दोघांना जणू जग जिंकल्याचा खुनशी आनंद मिळत होता.. आता ताई समाजापुढे हरणार आणि सोसायटी सोडून तिला आपण हाकलून देणार असा असुरी आनंद जणू त्या विकृत जोडप्याला झालेला..

पण भारतात उगाच नाही स्त्री ला शक्तीचे रूप मानत.. ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवतेच.. तसा आपल्या ताईनेही उठवला..

कोर्टात टाकलेल्या केस चे तारीख पे तारीख सुरू होते. सामान्य माणसाला, त्यातून स्त्रीला न्याय मिळणे किती अवघड असते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे..

डिसेंबर २०२० ला टाकलेल्या केस चे साधारण दीड वर्ष असेच गेल्यावर शेवटी मे २०२२ ला ताईने सरळ जज साहेबांशीच बोलायचे ठरवले.. पण कोर्टात चपराशी बोलून देतील तेव्हा ना.. आणि त्यांनी महिला पोलिसांना बोलावण्यास सुरुवात केली. (अर्थात ते आपली नोकरीतली कर्तव्ये बजवत होते. जे योग्यच होते…)

ताईने जेव्हा स्पष्ट शब्दांत, “पोलीस कमिशनरांना सुद्धा बोलवा, मी टॅक्स भरून या देशात राहते, माझ्या घरात घुसलेल्या, कसलीही क्रेडीबीलिटी नसलेल्या जमावाला मोकळं रान मिळणार असेल तर, आता मी शांत बसणार नाही!! किती वर्षे अशा चकरा मारू..??”

असा सवाल न्यालयाकडे केला.. तेव्हा अगदी फिल्ममध्ये घडल्यासारखे माननीय न्यायाधीश ताईशी बोलायला तयार झाले. एका पीडित महिलेचा सात्विक संताप समजून घेतला आणि तिला बाहेर थांबायला सांगून तिची केस फाईल मागवली.. सगळी केस समजून घेतल्यावर ताई आपल्या राहत्या घरी पुण्याला पोहोचेपर्यंत म्हणजे संध्याकाळ पर्यंत निर्णय ताईच्या बाजूने लागला..

सर्व गोष्टींच्या कायदेशीर बाजू बघून माननीय न्यायालयाने मुख्य आरोपी महेंद्र आणि पूजा अंधारे यांच्यावर IPC ४५२, ३२३, आणि ५०४ नुसार समन्स काढण्याचे आदेश दिले गेले.

तसेच नाशिक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, यांनी या प्रकरणात सुरक्षा पुरवण्यात दिरंगाई केल्याचा अहवाल नाशिक येथील पोलिस तक्रार प्राधिकरणाने वरिष्ठांना पाठवला.

ही जरी आनंदाची बाब असली तरी ह्या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. कारण एकटी राहणारी स्त्री, सिंगल मदर ह्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलण्यासाठी कायद्याचा बडगा उगरण्याची गरज निर्माण झाली आहे.

कर्ता पुरुष नसलेल्या कुटुंबाच्या विरोधात समाजाची मानसिकता इतकी खालच्या थराची असते, की त्यांना छळणे, त्यांच्याच घरात राहू न देणे, समाजात अपमान करणे असे सगळे लोकांना सोपे वाटते.. काही जण सगळे प्रकरण स्वतःच्या विकृत मानसिकतेमुळे गुन्हेगारी कडे वळवून मारहाण सुद्धा करतात.

कसे? ते आपण वरच्या केस मध्ये पहिलेच. त्याच मुळे सरकार कोणाचेही असो मात्र एकट्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावे म्हणून प्रशासनाने ह्यात तातडीने लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी वर उल्लेख केलेल्या महिला नेत्यांनी पाठपुरावा करावा ही विनंती तर आपण त्यांना करूच शकतो.

‘सिंगल मदर/ सिंगल वूमन अट्रोसिटी’ च्या कायद्याची तरतूदही केली गेली पाहिजे. वेळ लागेल खरे आहे पण ह्यावर विचार करून काम करण्यास, काही कायदे बनवण्यास तरी सुरुवात झाली पाहिजे.. तरच खऱ्या अर्थाने शक्तीरुप स्त्रीला समाजात जगणे सुसह्य होईल..!!

आणि जर तुम्हाला स्त्रीच्या आयुष्यात काटेच पसरायचे असतील तर मात्र त्या स्त्रीला तिच्या हक्कांसाठी पेटून उठावेच लागेल..

कसे आहे ना?! की जेव्हा, ‘घी सिधी उंगली से ना निकले तो उंगली टेढी करनीही पडेगी..’ आणि ते करून द्यायला भारतीय संविधानात आणि कायद्यात योग्य तशी तरतूद आहेच की..

त्यामुळे जेव्हा तुमच्या मनात जरासाही वावगा विचार असेल, तुम्ही कोणाही स्त्रीला, विनाकारण, तुमच्या करमणुकीसाठी आयुष्यातून उठवायचा प्रयत्न करणार असाल तर पुन्हा विचार करा..

‘जो नडला-तो फोडला’ अशीच आता सगळ्या स्त्रियांची मानसिकता आहे.. त्यामुळे मूलतः मायाळू असलेल्या देवी समान स्त्रीला रुद्र – काली रूपात यायला भाग पाडाल तर पस्तावाल..!!

तुम्हाला ह्या केस बद्दल आणि अशा कायद्याबद्दल काय वाटते हे आम्हाला जरूर कळवा. मनाचेtalks मध्ये समाज हिताच्या खुल्या विचारांचे कायम स्वागत आहे..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

13 thoughts on “स्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..!!”

    • इंटरनेटवर उपलब्ध माहिती नुसार

      अजय पॅलेस, पौर्णीमा बसस्टॉप, नाशिक – पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253-2594015, 0253-2594016 [email protected] नाशिकसाठी

      Address: MTNL COOPERAGE TELEPHONE EXCHANGE BUILDING 4TH FLOOR, Maharshi Karve Rd, Nariman Point, Mumbai, Maharashtra 400021 मुंबईसाठी

      ‘अनंत हाईट्‌स’ १ ला मजला, जाधवनगर, सर्व्हे क्रमांक २९-२-१, नांदेड सिटीजवळ, नांदेड फाट्याशेजारी सिंहगड रस्ता, पुणे ४११०६८ दूरध्वनी क्र. २४३८००७४ पुणेसाठी

      Reply
  1. ताई, मी वकील आहे काही मदत हवी असल्यास मला करायला नक्की आवडेल. माझा E मेल तुम्हाला वेबसाइटवर मिळाला असेल

    Reply
  2. लढा सुरू ठेवल्याबद्दल आणि जो काही निर्णय झाला आणि हा लढा असाच सुरू ठेवण्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन

    Reply
  3. अशा राक्षसांना अद्दल घडवण्याचे बळ प्रत्येकीत येवो. अभिमान आहे तुमचा.

    Reply
  4. राक्षस कुठले असे कलम आहेत कि, ५ वर्षे शिक्षा तर कुठेच गेली नाही. अति उत्तम लोकांमधली विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. एवढे बघत असताना गम्मत बघणारे हिजडे कुठल्याही मातेच्या पोटी जन्माला न येवो

    Reply
  5. बरोबर आहे, काही लोकांची लायकी अशीच नीच असते. मग त्यांनी आपल्या बरोबरचे लायकीच्या लोकांबरोबर पंगा घ्यावा, आपली उंची न पाहता कोणालाही भिडायला जाल तर महागात जाईल. माझ्या मुलीला मी हे आवर्जून वाचायला लावेल.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय